तरुणाई...सावधान
तरुणाई...सावधान
वीसएक वर्षांपूर्वी हृदयरोग म्हणजे जणूकाही मृत्यूपत्र असेच समजले जायचे. हृदयरोग झाला की त्याच्यावर कुठलाही उपचार नाही , असे समजले जाई. त्यावेळी तिशीच्या आतला हृदयविकाराचा एखादा पेशंट वर्षातून येत असे. परंतु ,
आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. प्रत्येक आठवड्याला मी किमान दोन ते तीन
तरूण हृदयरोग्यांवर उपचार करत आहे! या बदलत्या ट्रेंडचे कारण काय ? तर मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली.
धूम्रपान ही आज तरुणांची एक सवयच झाली आहे. दशकभरापूर्वी स्टेटस सिम्बल
म्हणवल्या गेलेल्या सिगारेट्सने तरूणाईला आपल्या सापळ्यात खेचले आहे. फास्ट
फूडचे आहारातील प्रमाण वाढत असल्याने शरीरात क्षार आणि न विरघळणारे
स्निग्ध पदार्थ शरीरात साठत राहतात. त्यातच व्यायामाचा अभाव असल्याने
स्थूलतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. साधा आहार आणि
योग्य प्रमाणातील व्यायाम यांच्या साहाय्यानेच तरुणाई यातून बाहेर पडू
शकते. आकड्यांच्या भाषेत बोलायचे झाले तर गेल्या ४० वर्षांमध्ये शहरांतील
तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण चारपटीने वाढल्याचे दिसते. ग्रामीण
भागातील तरुणांनाही हृदयविकार ग्रासत असून गेल्या ३० वर्षांमध्ये त्यात
दुपटीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
हृदयरोग हा विकार फक्त त्या व्यक्तीलाच होत नसतो तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला या रोगाचा विळखा पडतो. उपचाराचा खर्च ,
सतत घ्यावयाची काळजी आणि डोक्यावर असलेली टांगती तलवार यांच्यामुळे पूर्ण
कुटुंबच भीतीच्या छायेत जगत असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार
येत्या दहा वर्षांत भारतीय फक्त हृदयविकार , पक्षाघात आणि मधुमेहावर २३७ अब्ज डॉलर खर्च करतील. हे लक्षात घेतले म्हणजे हृदयविकाराचा धोका किती मोठा आहे , हे लक्षात येते. एकीकडे आपण सन २०२० मध्ये महासत्ता होण्याची स्वप्ने बघत आहोत. परंतु , एका अभ्यासानुसार सन २०२५ मध्ये भारतातील जवळपास २१४ दशलक्ष नागरिक उच्च रक्तदाबाशी झगडत असतील.
हृदयविकार बळावण्याच्या अनेक कारणांपैकी त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष
हेही एक मुख्य कारण आहे. छातीत दुखणे हे स्नायूंचे दुखणे किंवा अॅसिडीटी
आहे असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करणे जिवावर बेतल्याच्या अनेक केसेस
मी पाहिल्या आहेत. त्यामुळे नियमित तपासणी हा एकमेव प्रतिबंधात्मक उपचार
आपण सध्याच्या घडीला करू शकतो.
जागतिकीकरणामुळे जगण्याची पद्धत बदलली असून वर्क कल्चरच्या नावाखाली
दिनक्रमही बदलला आहे. पण त्यातही आपले आरोग्य उत्तम राखायचे असेल तर काही
बंधने तरूणांनी स्वतःवर घालून घेणे गरजेचेच आहे. सर्वात आधी कुठल्याही
प्रकारच्या धूम्रपानापासून लांब राहणे , चांगला आहार घेणे आणि मुख्य म्हणजे व्यायाम करणे. या त्रिसूत्रीचा अवलंब केला तरी तरुण मंडळी हृदयविकारापासून दूर राहू शकतील.
![](https://encrypted-tbn1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTMkFy4UkEgoyDOR-siz-mR8VIXgg9E6OG6eHcE6RUqmQqz058T_A)
No comments:
Post a Comment